राजकीय व्यक्ती आणि #राजकरण यांचा स्तर कालही आणि आजही तळाशीच आहे. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी केलेले राजकीय डाव वेळप्रसंगी मागे घेत राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो म्हणत मैत्री करायची असते. एक आमदार चुकून का होईना आज एक सत्य बोलून गेला की राजकीय लोकांचा समाज एकत्रच असतो वितुष्ट कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी हेच राजकारणी डावावर डाव खेळत स्वार्थ साधत असतात. थिल्लर, बालिश टीका करण्यात पुढाऱ्यांचे तोंड बंद होऊ शकत नाही तसच पद, खुर्चीची ताकद हातात असणारे कायद्याला हाताशी घेऊन विरोधकांना गतिरोध निर्माण करतात. कायदा शिक्षा करतो पण कधी पाहिले आहे का पुढाऱ्यांना शिक्षा भोगताना? काही अपवाद सोडले तर तात्पुरत्या शिक्षेनंतर बेल, कायद्याच्या पळवाटा शोधून हे पुढारी परत आपले राजकरण खेळताना मैदानात दिसतात. कधी हा माघार घेतो तर कधी तो पण सत्तेची संगीत खुर्ची सदैव ह्याच दोघांकडे असते. खेळत ते दोघे असतात पण खेळवले जाणारे आपण असतो, सर्वसामान्य माणूस. ज्याच्या आयुष्यात मर मर काम करणे, कुटुंबाच्या गरजा भागवणे, कष्टातून विरंगुळा म्हणून मनोरंजनासाठी खेळ, चित्रपट आणि राजकरण यावर भाष्य करणे यापलीकडे त्याच्या हातात असतो तो मोठा घंटा. मुळात हात रिकामेच असतात पण त्या रिकाम्या हातात नसलेली घंटा असतेच. काबाडकष्ट करणारा सामान्य माणूस स्वतःच्या मर्जीने खर्च करताना दहादा विचार करतो कारण मिळकत मर्यादित असते पण राजकारणी यापेक्षा भिन्न कारण स्वतःला मिळणारी मिळकत, भत्ते, पेंशन ठरवण्याचा हक्क स्वतः त्याच्याच हातात असतो. एकीकडे आम्ही जनतेचे सेवक म्हणून घ्यायचे, समाजकारण करतो म्हणायचे आणि दुसरीकडे व्हाईट पैसे पगार पेन्शन मधून तर वाममार्गाने ब्लॅक मनी लाटत राहायचे ह्याचे काम. जनतेचे सेवक म्हणवणारे ही लोक दादा, भाई, साहेब असतात यापेक्षा मोठा विनोद दुसरा कुठे? लिहावं तेवढ थोडंच कारण शिक्षणाच्या डिग्री घेऊन दिवसभर काबाडकष्ट करणारा सामान्य एकावेळी एकच काम करतो पण राजकारणी मात्र एकाचवेळी गल्लीतला, गावातला, सहकारी संस्था, खाजगी संस्था, खेळ, बँका,राजकीय पक्ष आणि अजून काय नाही नाही त्या ठिकाणी काम करण्याचे, निर्णय घेण्याचे काम करतो. साधं शिपाई होण्यासाठी दहावी बारावीचे सर्टिफिकेट सामान्य माणसाला लागते पण राजकारणी होण्यासाठी मात्र शिक्षणाची अटच नसते. स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी लोकांना लोकांशी भांडायला लावणारे, फायदा नुकसान याचा ताळेबंद लावून आरक्षण, नुकसान भरपाई देणारे हे पुढारी राजकारणात येतात तेव्हा रिकाम्या हाती येतात पण काही वर्षात कुबेराला ही त्याच्या घरी कामाला ठेवतात. पुढाऱ्यांत झालेला ह्या बदलाच्या विरुद्ध सामान्य माणूस खर्चाच्या डोंगराखाली कधी निम्मा तर कधी संपूर्ण बुडून जातो. सत्ता वा सत्तेच्या जवळ राहून राजकारणी सामान्य माणसाला खेळ खेळ खेळवतो. पूर्ण वेळ रिकामा असलेला हा राजकारणी क्षणांचा रिकामा नसतो. अडलेला, पडलेला, कधी स्वतःचे हित साधायला तर कधी कोणावर डुक काढणारा सामान्य माणूस राजकारण्यांच्या दाराचा उंबरा झिजवत असतो. स्वतःहून शिकार शिकाऱ्याचे तोंडात आपसूक पडत असते आणि शिकारी त्यावर ताव मारत असतो. वाचाळ राजकारणी हवे ते निरर्थक बोलतो, त्या बोलण्याची बातमी होते मीडियाच्या माध्यमाने देश,राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले जाते पण ह्याच नेत्या, पुढाऱ्यांच्या, राजकारण्यांच्या विरोधात सामान्य नागरिक बोलला की कायद्याच्या, पैश्याच्या जोरावर त्याला धडा शिकवला जातो, त्याला मारहाण केली जाते, आयुष्यातून उठवले जाते. असो इतपर्यत वाचत आलाच असाल तर एक गोष्टीची खूणगाठ नक्की मनाशी पक्की करा की तुमची आवड निवड एखाद्या राजकरण्याशी असू द्या, पक्षाशी असू द्या पण त्या लोकांना आदर्श मानण्याचा, देवत्व पद देण्याची चूक करू नका. कितीही आदर्शवत असणारा नेता हा आदर्श असेलच असे नाही कारण राजकीय डाव करणे हे त्याच्या रक्तात भिनलेले असते. कार्यकर्त्यांनो सजग व्हा रे......
हे इतकं लिहलेले का तुम्हाला माहित नाही तरीही मूर्खासारखं लिहतोय कारण मनात आलेले हे एकटा मीच विचार करत का खुडत बसावं म्हणून तुम्हाला ऐकवतोय. झालाच तर थोडा त्रास तुम्हालाही व्हायला पाहिजेच की कारण जे घडतंय त्याला जवाबदार आपण दोघेही समान भागीदार आहोत हे लिहताना एकदम मला क्रांतिवीर चित्रपटातील नाना पाटेकर आठवला. का सांगतोय मी हे तुम्हाला, का बरळतोय मी हे सर्व काही असा फील येऊन गेला. असो असाच अनुभव तुम्हाला यावा म्हणून ह्या लिंकवर क्लिक करा हवे तर
https://youtu.be/vfYJUHw5c70
असेच ब्लॉग वाचण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://diarynotes137.blogspot.com
लेख आवडला तर लाईक करा, शेयर करा. पुढचा लेख घेऊन येईपर्यत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.
।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा